डॉ. बी. आर. डॉ. आंबेडकर आणि त्यांचा शैक्षणिक दृष्टिकोण
- Chandan Damkondawar
- Apr 13, 2023
- 5 min read
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे, असे डॉ. आंबेडकर यांना वाटत असे जो समाज अशिक्षित असतो तो शिक्षणाअभावी सर्वस्व गमावलेला असतो. शिक्षणाने माणसात कर्तव्य आणि हक्काची जाणीव निर्माण होते. समाजाच्या सर्व स्तरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे आणि आपल्या शिक्षणापासून वंचित समाजाला शिक्षणाचे महत्व अत्यंत सोप्या भाषेत आणि कळकळीने समजावून सांगतांना बाबासाहेब म्हणत, "शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही."

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन एका उफाळलेल्या महासागरासारखे होते. आपल्या हयातील त्यांनी अनेक ग्रंथ, लेख लिहून ठेवले आहे. आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती झपाटयाने बदलत आहे आपल्या देशात देशात जातीयवादी, फुटीर आणि आतंकवादी शक्ती डोके वर काढीत आहेत. आत्मनिर्भर आर्थिक व्यवस्था कोलमडून जात असून भाववाढ आणि बेकारीचे फार मोठे संकट सामान्य जनतेवर कोसळत आहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी फुले-शाहू आंबेडकरांचे विचार समजावून घेऊन सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक समतेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत 4 वर्षे राहिले. त्यांना उत्तम प्राध्यापकांचे मार्गदर्शनही लाभले. त्यांनी नवा देश पाहिला. नवी संस्कृती पाहिली, नवे ज्ञान अनुभवले, माणसा-माणसातील संबंधाची जाण त्यांना आली. आपल्या भारतीय परिस्थितीशी तुलना करण्यासाठी त्यांना नवे गवसले. भेदभावाची कृत्रिम बंधने नसलेला मुक्त समाज त्यांनी पाहिला. नवे जग पाहून ते भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, याची त्यांना खात्री पटली. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानव वंश शास्त्र, कायदा इत्यादी विविध शास्त्रांचा अभ्यास केलेला व त्या विषयात पारंगत असलेला शिवाय सामाजिक बांधिलकी मानणारा नेता त्यावेळी दुसरा कोणी नव्हता. त्यांना पर्शियन संस्कृत, फ्रेंच आणि जर्मन हया परदेशी भाषेचेही त्यांना चांगले ज्ञान होते.
त्यांचे आयुष्य तीन गुरूंनी घडले ते बुध्द, संत कबीर, महात्मा ज्योतीबा फुले. राजर्षी शाहु महाराज यांना आपले गुरू मानत असत. 6 डिसेंबर, 1956 साली दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले. या ठिकाणी फक्त त्यांच्या शैक्षणिक जीवनपटावर प्रकाश टाकण्यात आला.
प्राथमिक शिक्षणाविषयी विचार-
केवळ बाराखड्या शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर मुलांची मने सुसंस्कृत करणारे दर्जेदार शिक्षण शाळांनी दिले पाहिजे. इतका सुक्ष्म विचार बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाबाबत केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वागिण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे. केवळ लोकांच्या खुशीवर हा प्रश्न सोपविल्यास प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होण्यास कैक शतके लागतील म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सक्तीचा कायदा करावा लागतो. आघाडीस आलेल्या जगातील सर्व देशांनी सक्तीचा कायदा करूनच लोकांची निरक्षरता हदपार केली, असे आपणांस दिसून येते. जे वर्ग आधीच शिक्षणाचा लाभ घेतात. त्यांच्यावर शिक्षणासाठी अर्थातच सक्ती करावी लागत नाही. ज्यांना शिक्षणाचे महत्व कळत नाही व जे त्या बाबतीत उदासीन असतात. त्यांच्या करीताच सक्तीच्या कायद्याची आवश्यकता असते. म्हणून या देशात शिक्षणामध्ये मागासलेले जे वर्ग आहेत. त्यांच्या जिव्हाळयाचा हा प्रश्न आहे. प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत कायद्याने सक्ती करावी.
उच्चशिक्षणाविषयी विचार -
जे व्यक्तीसमुह बौध्दीक दृष्ट्या उच्च शिक्षणाचा महत्तम लाभ घेण्यास समर्थ आहेत. पण आर्थिक स्थिती योग्य नाही म्हणून किंवा नाही अडचणी आहेत म्हणून असे वर्ग या शिक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत, त्यांना उच्च शिक्षणाच्या सुविधा पुरविण्यासाठी विद्यापीठ ही प्राथमिक स्वरूपाची यंत्रण होय, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटते.
केवळ लिहीण्यावाचण्याचे ज्ञान पुरेसे ठरणार नाही तर शिक्षणाच्या उच्च टोकापर्यंत पोहचले पाहिजेत, म्हणजे त्यांच्याबरोबर वाटचाल करून संपूर्ण समाजाचा दर्जा उंचावेल.
मिलिंद महाविद्यालयाच्या शिलान्यास प्रकरणी बोलतांना बाबासाहेब म्हणतात, "हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे मी जाणतो खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येते. पण हे चुक आहे. कारण हिंदूस्थानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे, त्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करून पुर्वीप्रमाणे त्यांना उच्च वर्गाची सेवा करण्यास भाग पाडणे नके खालच्या वर्गाची प्रगती मारून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागत असल्यामुळे त्यांच्यात निर्माण होणारा न्युनगंड नाहीसा करणे, हे खरे शिक्षणाचे ध्येय आहे. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर उच्च शिक्षण हेच एकमेव औषध आहे. "
विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षणाविषयी विचार-
उपयोगी शिक्षण म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखातील उच्च शिक्षण होय. परंतू हेही वास्तव आहे की, अनुसूचित जातीतील बहुतांश लोक त्यांची स्थिती, त्यांच्या जवळ उपलब्ध संसाधने त्यांची कार्यक्षमता यांचा विचार करता विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखातील उच्च शिक्षण यांना खुले होणार नाही आणि याच कारणास्तव केंद्रीय सरकारने यांना या शाखेतील उच्च शिक्षणाकरीता अर्थसहायासाठी पुढे येणे न्याय, योग्य आणि आवश्यक आहे.
हिंदूस्थानात विद्यापीठात किंवा तत्सम विज्ञान आणि तंत्रशिक्षण संस्थात अनुसूचित जातीतील विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखातील उच्च शिक्षण घेत असतील तर त्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती रूपाने हिंदूस्थान सरकारने वार्षिक अनुदान द्यावे.
इंग्लंड, राष्ट्रकुल राष्ट, युरोप आणि अमेरिका येथील विद्यापीठातून अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखातील उच्च शिक्षणासाठी हिंदूस्थान सरकारने अनुदान द्यावे.
नैतिक शिक्षण, शीलसंवर्धन चारित्र निर्मिती शिक्षण-
शिक्षण ही तलवार आहे, शिक्षण हे शस्त्र आहे. जर एखादा मनुष्य येथे तलवार घेउन आला तर आपण सर्वजण त्यास घाबरून जात. परंतू विद्याचे शस्त्र हे नेहमी वापरणा-यावर अवलंबून असते. हत्याराने अबलांचे सरंक्षण मनुष्य करू शकेल. चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम परंतू वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे बरे नाही. शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील व सौजन्य नसेल तर तो हिंस्त्र पशुपेक्षाही कुर व भीतीप्रद समजण्यात यावा.
केवळ शिक्षणाने योग्यता येते असे नाही-
केवळ शिक्षण घेतले म्हणजे योग्यता येते, असे वाटत नाही. मनुष्य विद्वान झाला की, तो समाजाला उपयुक्त होतोच असे नाही विदवान मनुष्य लुच्या लबाड, उसण्या आणखी वाटेल त्या दुर्दुणांचा असू शकतो तेव्हा शिक्षणाबरोबरी माणसाच्या अंगी शील असणे महत्वाचे आहे.
स्त्री शिक्षण-
स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून आहे. स्त्रियांनी स्वच्छ राहण्यास शिकावे व सर्व दुर्गुणांपासून मुक्त राहावे. तुमच्या मुलांना शिक्षण दया, हळूहळू त्यांच्या मनात महत्वकांक्षा जागृत करा. ते थोर पुरुष होणार आहेत, असे त्यांच्या मनावर बिंबवा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रिमुक्तीविषयक कार्य हे केवळ उपेक्षित, वंचित घटकातील स्त्रियांपुरतेच मर्यादित नव्हते तर देशातील सर्व स्त्रिवर्गाच्या उध्दाराचे कार्यव्रत त्यांनी घेतले होते. जाती, वर्गविरहीत स्त्रिवर्गाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी त्यांनी वेळोवेळी आपल्या लिखाणातून, भाषणातून व चळवळीतून विचार मांडलेले आहेत. एकूणच भारतीय समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यात विद्यार्थी दशेपासूनच स्त्रिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. कोलंबिया विद्यापिठात उच्च शिक्षण घेत असतांना आपल्या वडीलांचे स्नेही सुभेदार शिवनाक जमेदार यांना न्यूयॉर्क वरुन ४ ऑगस्ट १९१३ रोजी पाठविलेल्या पत्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्रिस्वातंत्र्य व स्त्रिशिक्षणाबद्दलचा उदात्त दृष्टीकोन स्पष्ट होतो.
या पत्रात जमेदारांना ते लिहितात, “We must how entirely give up the idia that parents give" Janma to the child and not" "Karma" They can mould the destiny of their children and if we but follow this principle be sure that we shall soon see batter day and our progress will be greathly accelerated if male education is persued side by side with female education the fruit of which you can very well see verified your own daughter"
अर्थात, आई-बाप आपल्या मुलाला जन्म देतात, कर्म देत नाही, असे त्यांचे म्हणणे ठिक नाही. आई-बाप मुलांच्या आयुष्यात वळण लावू शकतात. ही गोष्ट आपल्या लोकांच्या मनावर बिंबवून जर आपण मुलांच्या शिक्षणाबरोबरच मुलीच्याही शिक्षणासाठी धडपड केली, तर आपल्या समाजाची प्रगती झपाटयाने होईल.
विदयार्थ्यांना शिक्षणाविषयी उपदेश-
विदयार्थ्यांनी चाळीचाळीत जाउन जनतेचे अज्ञान आणि खुळया समजूती दूर केल्या पाहिजेत. तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काही लाभ होईल ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवाची सुधारणा, प्रगती करण्याकरीता केला पाहिजे तरच भारत उन्नतावस्थेला जाईल. विद्येशिवाय मानवाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. विदयाही सर्वांना अवगत झाली पाहिजे ती मासागरासारखी आहे. अपुरे विद्यार्जन करून काही उपयोगाचे नाही परिक्षा कोणीही पास होतो. नुसत्या परीक्षा पास होउन पदव्या मिळविण्यात काही अर्थ नाही. विद्यार्थ्यांनी रचनात्मक कार्य करून दाखविले पाहिजे.
शिक्षण संघटना / परिषदा-
डॉ. बाबासाहेबांच्या निरीक्षणानुसार शिक्षणाच्या प्रश्नाकडे किंवा विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीकडे विदयार्थ्यांच्या एकाही परिषदेने जास्त लक्ष दिले नाही. विदयार्थ्यांच्या एकाही परिषदेने जास्त लक्ष दिले नाही विद्यार्थ्याच्या निरनिराळया संस्था, निरनिराळ्या संस्था, निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या चाकाला बांधलेल्या असतात.
भावी जीवनाची उभारणी विदयापीठात होते-
विद्यार्थ्यांनी काय शिकावं हे विद्यापीठ ठरवित असलं तरी आपल्या बौध्दीक विकासाला आपण शिकलो ते खरोखरच पोषक व आवश्यक आहे की नाही, हेही प्रत्येक विदयार्थ्यांने पाहिले पाहिजे त्यांच्या भावी जीवनाची उभारणी याच ठिकाणी होत असते तो राष्ट्राच्या आदर्श नागरिक होणार की. त्याचे जीवित विफल होणार हे ही शिक्षणकमच ठरविणार असल्यामुळे विदयापीठाच्या प्रत्येक हालचालीवर विद्यार्थ्यांचे कटाक्षाने लक्ष पाहिजे.
शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटित व्हा, आत्मविश्वास बाळगा. कधीही धीर सोडू नका ही जीवनाची पंचसूत्री आहे. विद्यार्थी वर्गाची शिक्षण संपादनाच्या दृष्टीने परिस्थिती बरीच खालावलेली आहे. परंतु अलीकडे विद्यार्थी शिक्षणापेक्षा राजकारणातच जास्त दंग असलेले दिसून येतात. हा सुध्दा शैक्षणिक -हास होय. विद्यार्थी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या प्रश्नांकडेक त्यांनी अधिक लक्ष पुरवावे.
या सर्व बाबीवरून स्पष्टपणे दिसून येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन किती प्रगल्म होता, हे यावरून समजते. घरातील स्त्री शिकली तर संपूर्ण कुटूंब हे सुशिक्षित होते. हा त्यांचा त्यावेळेचा दृष्टीकोन आजही शंभर टक्के लागू पडतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त एकाच जातीतील स्त्रीचा विचार केला नाही तर संपूर्ण जाती धर्मातील स्त्रीयाकरीता त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले. डॉ. आंबेडकरांची भारताच्या भवितव्यावर प्रगाढ निष्ठा होती. परिस्थिती अनुकुल असेल तर या जगातील कोणतीही शक्ती भारताला एकात्म होण्यापासुन प्रतिबंधित करू शकणार नाही. असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृढविश्वास होता. यामध्येच डॉ. बाबासाहेबांचे शैक्षणिक विचार दिसून येतात.
चंदन दमकोंडावार
Comments